काँग्रेसचे बाजीप्रभु फितुर मावळ्यांमुळे संगमनेरच्या खिंडीत अडकले, स्वतःच्या बालेकिल्ल्यात चारीमुंड्याचित.!

- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :- 
                      संगमनेर विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे असा अभूतपूर्व इतिहास घडला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेचे अमोल खताळ यांनी दारुन पराभव केला. त्यामुळे, ४० वर्षांच्या साम्राज्याला चाळीस वर्षांच्या तरुणाने सुरुंग लावला आणि प्रचंड मोठा अनपेक्षित असा स्पोट झाला. खरंतर, काँग्रेसचे बाजीप्रभू म्हणुन पक्षाची खिंड लढवणारे बाळासाहेब थोरात यांची घोडदौड जिल्ह्यात वेगाने सुरू होती. त्यांनी नगर दक्षिणेला सुजय विखें, अकोल्यात वैभव पिचड आशा दिग्गज नेत्यांचा पराभव करून अनेक आमदारांना निवडून आणले होते. त्यानंतर, राहता परिसरातील गणेश कारखाना ताब्यात घेतला. शिर्डी संस्थांची सोसायटी ताब्यात घेतली. त्यामुळे, थोरात साहेबांना मिळत असलेले यश म्हणजे विखें पाटलांच्या काळजावर होणारे हे घाव होते. त्यामुळे, विखें कुटुंबाने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ कानामागे टाकले आणि संगमनेर मतदारसंघात लक्ष घातले. त्यांनी काँग्रेसचे बाजीप्रभू बाळासाहेब थोरात यांना स्वतःच्या मतदारसंघात खिंडीत पकडुन कोंडीत पकडण्याचा डाव आखला. त्यांना विधानसभेत स्वतःच्या मतदारसंघातच चारीमुंड्याचित केले. त्यामुळे, काँग्रेसच्या बाजीप्रभूंना पराभुत करून अमोल खताळ यांनी नव्याने इतिहास घडविला. या विधानसभेच्या रणांगणात श्रीकृष्णाची भूमिका बजावली ती डॉ. सुजय विखें पाटील यांनी तर रणांगणात कर्णाची भुमिका बजावली ती कार्यकर्त्यांनी. त्यामुळे, कधी नव्हे अपराजित थोरात साहेब पराजीत झाल्याचे सर्वांना पहायला मिळाले.
नगर दक्षिणचा वचपा संगमनेरात काढला.!
डॉ. सुजय विखें पाटील यांना लोकसभेला पराभुत करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ताकद लावली होती. संपूर्ण थोरात साहेबांची यंत्रणा दक्षिण नगरला लावुन डॉ. सुजय विखें यांचा पराभव केला. यामध्ये खा. निलेश लंके यांचा विजय झाला. परंतु, सुजय विखें यांना लोकसभेतील पराभव हा जिव्हारी लागला. त्यांचा पराभव होताच त्यांनी संगमनेरात लक्ष केंद्रित केले. आपल्या पराभवाची सल संगमनेर विधानसभेला थोरात साहेबांना पराभूत करूनच पूर्ण होईल. असा चंग विखें कुटूंबाने बांधला. राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकमंत्री पद मिळाले. त्यांनी अमोल खताळसह कार्यकर्त्यांना बळ देऊन या मतदारसंघातील काही ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या. या मतदारसंघात सहाशे कोटींपेक्षा अधिक निधी देऊन संगमनेरात आपली पकड निर्माण केली. त्यानंतर, विधानसभेच्या रणांगणात डॉ. सुजय विखे यांनी भाषणे ठोकली. त्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, तिकीट सुजय विखें यांना नसले तरी त्यांनी "अरे ला कारे" उत्तर देणारा कार्यकर्ता शोधला. अमोल खताळ यांना उमेदवारी देऊन लढा उभा केला. त्यांनी बाळासाहेब थोरात यांची नस ओळखुन निमोण, तळेगाव भागात नंतर साकुर भागातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मतदारसंघ संपूर्ण पिंजूण काढला. येथे जनसेवेचे कार्यालय सुरू करून प्रशासकीय पातळीवरील कामे मोठ्या प्रमाणात केली. जनता दरबार ठेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. या जनता दरबारला मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद देत होते. अमोल खताळ यांना विशेष अधिकार देऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, कधी नवे असा इतिहास घडला. अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून डॉ. सुजय विखें यांनी नगर दक्षिणचा वचपा काढला.
थोरातांना अंधारात ठेऊन कार्यकर्त्यांनी पराभव केला.!
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांचा दुवा थोरात साहेब झाले. काँग्रेसचे जेष्ठ नेते असल्याने ते सत्तेचे समीकरण जुळू लागले. मात्र, संगमनेरकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. साहेबांची भेट दुर्मिळ झाली. त्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांनी अवती भोवती फक्त ठेकेदारांची पिलावळ आणि जमीन खरेदीविक्रीची पिलावळ तयार केली. दोन पैसे कमवण्यासाठी कार्यकर्त्यांची चढा ओढ लागली. त्यामधून मोठं-मोठ्या गाड्या घेतल्या खऱ्या. पण, त्या गाडीची काच सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाहुन खाली होत नव्हती. थोरात साहेब मंत्री असताना सुध्दा कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडला. कोणी नदीचे लोचके तोडले तर काहींवर जमीन बळकवण्याचा आरोप झाले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले महायुती सरकार आले. पण, कार्यकर्त्यांचे उद्योग कमी होताना पाहिला मिळाले नाही. जिल्हा परिषद सदस्यांवर कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा रोष पहायला मिळाला. ते जनतेत नसल्याने ते फक्त स्वतःचे घरं भरतवत असल्याचा आरोप झाला. काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड झाला. काही पदाधिकारी जेलवारी करत आहे. तर काही जेलवारी करून बाहेर आले आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत गेला. खरंतर, तालुक्यातील विकास कामे केली. त्याचे ठेके तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतले. रस्ता केला तर तो रोल सारखा हाताने घडी घालता येईल असा होत होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. पण, वेळीच यांची कानउघडणी केली नाही. गाव-गावचे ठेके काही ठराविक लोकांना मिळत गेले. योग्य वेळी भाकर फिरवायला हवी ती फिरवली नाही. युवक काँग्रेसचे पदे ठेकेदारांच्या मुलांना, ठराविक घरात, बाप सरपंच मुलगा युवक काँग्रेसचा पदाधिकारी हे घडतं गेले आणि सर्वकाही अंगलट आले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे, जिथे पदे दिली तिथेच थोरात साहेबांना कमी मते पडत गेली. खरंतर, युवा संवाद यात्रा निघाली तिला युवा पिढीचा प्रतिसाद मिळाला नाही. हे वेळीच ओळखायला हवे होते. पण, गांधारीची पट्टी घालुन फिरणारे पदाधिकारी हे साहेबांना अंधारात ठेवत गेले. डॉ. जयश्री थोरात यांना सात लाख जनतेच्या बापाच्या वक्तव्यावरून ट्रोल करण्यात आले. पण, तो व्हिडीओ सुजय विखे यांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांकडूनच फिरवण्यात आला. त्यामध्ये या वाक्यावरून ट्रोल होतील हे सुद्धा लक्षात आले नाही. तेथे कार्यकर्ते टाळ्या पिटवत गेले आणि त्या वाक्यावरून जयश्री थोरात मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर ट्रोल झाल्या. प्रतिस्पर्धी अमोल खताळ यांना हलक्यात घेतले ही सर्वात मोठी चुक झाली. सुजय विखें पाटील हे उमेदवारी करतील. म्हणुन त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. तेव्हा वातावरण थोरात साहेबांच्या अनुकूल होते. परंतु अमोल खताळ यांना उमेदवारी मिळताच साहेब लाखांच्या मताने निवडून येतील. आशा अविर्भावात चर्चा करून तेथेच घात झाला. जनतेत सुप्त लाट होती. त्याचा विस्फोट नविन नगररोड वरील १८ तारखेच्या सभेत दिसला. तेथुन पुन्हा थोरात साहेबांनी गाव भेट दौरा व फोन सुरू केले म्हणुन ही लढत काट्याची झाली. नाहीतर कार्यकर्त्यांच्या विश्वासावर असते. तर यापेक्षा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला असता हेच वास्तव आहे.
आमदार अमोल खताळांचा पक्षाअंतर्गत संघर्ष.!
अमोल खताळ हे भाजपात असताना त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अमोल खताळ यांचे नाव भाजपा तालुका अध्यक्षपदी चर्चेत आले. तर अनेक दुःखी आत्मे वरिष्ठ भाजपला भेटले. अनेकांनी राजीनामा देण्याच्या वलग्ना केल्या. अमोल खताळाना तालुका अध्यक्षपद मिळु दिले नाही. पण, नाराजी दुर करण्यासाठी त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केले. त्याचा पुरेपूर फायदा अमोल खताळ यांनी उचलला. त्यांनी तालुक्यात हजारो वयोवृद्धांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळून दिला. चार कोटी रुपये लाभधारकांच्या खात्यात वर्ग झाले. तरी देखील त्यांना पक्षांतर्गत विरोध झाला. त्यांचे भाजपच्या एका गटाकडून कुठेही बॅनरवर फोटो दिसले नाही. नेहमी अमोल खताळ या नावाने विष पेरण्यात आले. ऐन विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी वसंतराव देशमुख यांनी चुकीचे विधान केले. त्याचा फटका सुजय विखें याना मिळाला. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. येथे उमेदवार कोण? असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी अमोल खताळ हे नाव पुन्हा पुढे आले. अमोल खताळ यांच्या एवढा तुल्यबळ उमेदवार नाही हे सुजय विखें यांच्या देखील लक्षात आले. मात्र, अमोल खताळ यांना उमेदवारी मिळताच "घरचा भेदी लंका दहन" अशीच गत भाजपात पहायला मिळाली. हे नाव ऐकताच अनेकांच्या पोटात गोळाच उठला. अमोल खताळ नावाची गरळ ओकण्यास सोशल मीडियावर सुरवात करण्यात आली. कोणी ब्लॅक डे लिहीले तर कोणी ब्लॅक मेलर लिहले. मात्र, अमोल खताळ यांनी दहा-वीस कार्यकर्ते जिवाभावाचे तयार करून हा लढा उभा केला. त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला. जस-जसे वातावरण बनत गेले. तरुण मुलं ऍक्टिव्ह होत गेले. परिवर्तनाचे वारे वाहू लागले. नंतर विखें पाटील यांनी सर्वांची कानउघडणी केली. तेव्हा सर्वजण मैदानात उतरले. आता अमोल खताळ यांच्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण पुढे येत आहे. मात्र, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे मंत्री असल्यापासुन सर्वात कडाडून विरोध कोणी केला असेल तर तो अमोल खताळ यांनी केला. भर पावसात विरोध केला, आंदोलने केली, निदर्शने केली, मोर्चे काढले. इतकेच काय.! बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांना कोट्यावधी रुपयांचा दंड करून सर्व कागदावर घेतले. तालुक्यात सातत्याने चुकीच्या कामांविरोधात बोलणारा. अंगावर आल्यावर शिंगावर घेणारा हा एक तरुण नेता अशी ओळख असल्याने हा तरुण चेहरा उमेदवार होऊ शकतो हे सुजय विखें यांच्या लक्षात आले. त्यामुळे, अमोल खताळ यांना विरोध असताना देखील उमेदवारी मिळाली. ती ऐतिहासिक विजयाची ठरली.

साहेबांसोबत अमित भांगरे सुद्धा खिंडीत अडकले.!

 पठार भागावर अमित भांगरे यांना मदत करावी असा संदेश बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. मात्र, तेथे अजय फटांगरे, गौरव डोंगरे यांच्यासह कोणाचीही जादू चालली नाही. अनेकांनी फक्त उमेदवार यथेच्छ लुटण्याचा आनंद घेतला. मात्र, ज्या पठार भागाहून थोरात साहेब म्हणाले होते. अमित भांगरे यांना १० हजारांचे लिड देऊ. त्या पठार भागावर ३ हजार  मायनस राहिल्यामुळे भांगरे यांची गणिते पुर्ण बदलून गेली. संगमनेरच्या संपुर्ण तालुक्याने बाळासाहेब थोरात यांचा घात केला त्यात पठार भागात वेगळे काहीच नव्हते. बाळासाहेबांना मुख्यमंत्री करायचे असे अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत होते. कसं? थोरात साहेब म्हणतील तसं.! पण, साहेब म्हणतील तसे काहीच झाले नाही. पठार भागावर सत्ताधाऱ्यांनी प्रचंड पैशांचा पाऊस पाडला, जेवणासाठी हॉटेलं बुक केले, रात्रीतून मतांची सौदेबाजी झाली. त्या लाटेपुढे थोरात साहेबांच्या कार्यकर्त्यांनी नांग्या टाकल्या. मतदान झाल्यावर अनेकांना वाटत होते. की, १० नाही पण ३ ते ४ हजारांचे लिड पठाराहून मिळेल. पण, खोके आणि पेट्यांपुढे मतदार बाळासाहेबांना देखील विसरुन गेले. तर, माजी आमदारांनी बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून पठाराहून मते काढली. तुम्ही म्हणजे पठारभाग नाही, तुम्ही म्हणाल तसे पठार भाग ऐकत नाही, तुमच्या शब्दाला पठार भाग बांधिल नाही, थोरात साहेब, तुम्ही पठारावर जाऊन म्हणाले, डॉ. लहामटेंनी कोरोना काळात अकोल्यात माझा अपमान केला, त्याचा बदला घ्यायचा आहे. पण, तुमचा मान, अपमान, मान सन्मान याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. अशा प्रकारचा संदेश पठार भागाने दिला. त्यामुळे, चंदनापुरीच्या खिंडीत देखील थोरात साहेब अडकले आणि पठारावर सुद्धा त्यांच्या शब्दाचा दारुन पराभव झाला, अकोल्यात देवठाण गट सोडता सगळीकडे भांगरे यांना चांगली मते आहेत. मात्र, पठारावर ५ ते ६ हजार मते असती तरी भांगरे यांचा विजय सहज होता अशा भावना व्यक्त केल्या जात आहे.