संशयाच्या कारणाहुन पत्नीची हत्या, पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजार, होय.! मीच तीचा खुन केला आहे.!

सार्वभौम (राजूर) :- 

अकोले तालुक्यातील राजूर परिसरात शिळवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुर्‍हाड व कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिता संतोष साबळे (वय ४०, रा. शिळवंडी, ता. अकोले, जि. अ.नगर) या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. तर, आरोपी संतोष साबळे (वय ४५) याने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वत:हून राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून आरोपी संतोष साबळे यास ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संतोष साबळे आणि मयत पत्नी सुनिता यांचा २० वर्षापुवीर्र् विवाह झाला होता. त्यांच्यात अनेक वर्षे चांगले चालले होते. मात्र, दरम्यानच्या काळात पत्नीच्या संशयाहून घरात कायम वाद निर्माण होत होता. घरात होणारा कायमचा वाद हा साबळे यास त्रासदायक वाटत होता. तर, पत्नीचे वागणे चांगले नसल्याची भावना त्याच्या मनाला वारंवार खात होती. त्यामुळे, कुटुंबात तणावपुर्ण परिस्थिती कायम निर्माण होत होती. यांच्यातील कायमचे वाद हे शेजार्‍यांना देखील अंगवळणी पडले होते. त्यामुळेे, यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम पर्याय होता. 

दरम्यान, सोमवारी सकाळी दोघे झोपेतून उठल्यानंतर ते एकमेकांचे आवरत होते. या दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणाने वाद निर्माण झाला आणि संतोष साबळे याने पत्नीस शिविगाळ, दमदाटी सुरु केली. तुझे जे उद्योग सुरू आहे ते बंद कर असे तो म्हणत होता. मात्र, माझे असे काही नाही जे तुमच्या मनात आहे अशी चर्चा दोघांमध्ये सुरू होती. मात्र, शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यानंतर रागाच्या भरात संतोषने घरातील कुर्‍हाड व कोयता घेऊन थेट सुनिताच्या डोक्यात मारला. डोक्यात आणि कानाच्या मागे लागलेले घाव जिव्हारी होते त्यामुळे, त्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, संतोषचा राग इतका होता. की, त्याने जीव जाईपर्यंत सोडले नाही.

दरम्यान, घटना घडल्यानंतर आरोपी संतोष याचा राग शांत झाला. मात्र, आता त्याच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. पत्नी मयत झाल्याचे लक्षात आले. मात्र, राजुरपासून शिळवंडी हे अंतर जास्त असल्यामुळे तत्काळ उपचार करण्यासाठी देखील संधी मिळाली नाही. त्यामुळे, काही मिनिटात सुनिताने जीव सोडून दिला. आता पळुन गेले तरी पोलीस शोध घेणार आहे. बहाणा बनविला तरी पोलीस गुन्ह्याची उकल करणार आहे. त्यामुळे काय करावे? असा विचार केल्यानंतर संतोष साबळे याने अंतिमत: ठरविले की, थेट पोलीस ठाण्यात जायचे आणि हजर होऊन जे काही घडले तर कथन करायचे. त्यानंतर साबळे पोलीस ठाण्यात आला आणि त्याने घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.