डॉ.लहामटे, गायकर पा. व मधुभाऊ एकत्र.! कॉंग्रेसने भाजपची बी टिम होऊ नये आणि शिवसेनेने हवेत जाऊ नये.!

 

 
- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                              अकोले तालुक्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता रंगत चढू लागली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रस, भाजप या प्रमुख चार पक्षांच्या भुमिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने आज त्यांचे स्वबळाचे धोरण जाहिर केले असून ते त्रिकालबाधी सत्य आहे. कारण, तो राष्ट्रीय पक्ष असून त्यांच्या समांतर तथा तुल्यबळ सर्व पक्ष महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे, ते म्हणू शकत नाहीत की आम्ही मनसे सोबत लढणार.! परंतु, या सर्व राजकीय उलथापालथेत कॉंग्रेस आज वेगळाच भाव खावून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. की, कॉंग्रेस-भाजप सोबत जाऊ शकते. खरंतर चर्चा करणाऱ्यांना हे कसे कळत नाही. की, ज्या भाजपला तालुक्याने 2019 मध्ये विधानसभेला नाकारले, ज्या कॉंग्रेसने त्यांना राज्यातून आणि देशातून हद्दपार करु पाहिले आहे. ज्या भाजपला नामोहरम करण्याची जबाबदारी ना. थोरात यांच्यावर दिलेली आहे आणि ज्या मधुभाऊ नवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझी भाजपमध्ये घुसमट होत होती. ते विचार आणि तत्व आपले नाही. आज त्या मधुभाऊंचे मन सत्तेसाठी भाजपसोबत रमेल का? असे झाले तर आज जो कॉंग्रेसचा चेहरा तालुक्यात उभा राहतो आहे. त्याची प्रतिमा राज्यात व तालुक्यात किती डागाळेल.! पुरोगामीत्वाचे टेंभे मिरविणारा पक्ष भलतिकडे चुल मांडू पहात असेल तर जनता त्यांचा धुर केल्याशिवाय राहणार नाही. आता हे राजकीय शहाणपण ना. थोरात साहेब  व आदरणीय मधुभाऊ यांना फार उत्तम आहे. त्यामुळे, कॉंग्रेस आणि भाजप हे समिकरण अकोल्यात तरी अशक्य आहे. त्यातल्या त्यात भाजप कमळवर निवडणुक लढविणार असल्याने तर या शक्यता पुर्णत: स्पष्ट झाल्या आहेत. जर पॅनल किवा शहर विकास आघाडी वैगरे स्थापन केली असती तर हरकत नव्हती. परंतु, आता ते शक्य नाही. आता हे अशक्य असले तरी, कॉंग्रेस स्वबळावर लढल्यास देखील भाजपला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, एकेकाळी म्हणजे 2014 च्या निवडणुकीत वंचित आघाडीला भाजपची बी टिम म्हणून आरोप झाले होते. तशी भुमिका कॉंग्रेस पार पाडते की, महाविकास आघाडीचा धर्म पाळून कोणत्याही परिस्थितीत ताणाताण न करता नगरपंचायत लढवते. हे पाहणे महत्वाचे आहे. आज क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त आमदार, पाटील व भाऊ अकोल्यात एकत्र आले होते. तेव्हा अनेकांनी त्यांना असेच एकत्र राहण्याची विनंती केली. तेव्हाच जिल्हा बॅंकेचे संचालक नवले यांनी एकत्र लढण्यास ग्रिन सिग्नल दिला आहे. 


दरम्यान, मधुभाऊ नवले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अकोल्यात अनेक कार्यकर्त्यांच्या हाताला बळ मिळाले. यात मधुभाऊंना बळ मिळावे म्हणून ना. थोरात साहेबांनी त्यांना अचानक सुखद धक्का देत जिल्हाबँकेवर नियुक्त करुन अधिक बळ दिले. अर्थातच निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही नियुक्ती त्यांना गरुडझेप घेण्यासाठी प्रचंड उर्जा देणारी आणि पंखात बळ भरणारी ठरली. त्यामुळे, तालुक्यात त्यांचे सत्कार, मिरवणुका आणि हार तुऱ्यांची उधळण झाली. हे बळ इतके उत्स्पुर्त होते की. लगेच महात्मा फुले चौकात पक्षाचे कार्यालय, कार्यकर्त्यांचा लावाजमा आणि भाजप बरोबरीने उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती देखील त्यांनी घेण्यास सुरुवात केली. यात विशेष म्हणजे महाविकास आघाडीत अद्याप ना शिवसेना ना राष्ट्रवादी यांनी चर्चा केली आहे ना जागा वाटपाचा विषय काढला आहे. तोच कॉंग्रेसच्या मुलाखती देखील पुर्ण होत आल्या आहे.  त्यामुळे, खऱ्या अर्थाने नामदार साहेबांचा निशाना योग्य लागल्याचे दिसते आहे. खरंतर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जायचे फिक्स केले आहे. कारण, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे ते बंडाच्या भुमिकेत नाहीत. सन्मानपुर्वक जागा घेऊन ते आपला महाविकास आघाडी धर्म पाळणार आहेत. त्यामुळे, त्यांच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही.

          आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना पत्र काढले आहे. की, स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढाव्यात. त्यामुळे, अनेक ठिकाणी कॉंग्रेस नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, राज्यात जरी स्वबळाचा नारा दिला. तरी, अकोल्यातील परिस्थिती तशी नाही. कारण, कॉंग्रेस हा पक्ष म्हणून कमी आणि मधुभाऊ नवले म्हणून अधिक प्रबळ झाला आहे. तर, पक्षीय राजकारण कमी आणि नात्यागोत्याचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे. आता शहरात सिताराम पाटील गायकर व मधुभाऊ नवले यांची चलती असली तरी यांचे नातेसंबंध फार काही विभिन्न नाही. त्यामुळे, पाटील की भाऊ.! हा फार मोठा संभ्रम मतदारांपुढे उभा राहु शकतो. जसे, २०१९ ला पिचड भाजपत गेले तेव्हा पवार साहेब की पिचड साहेब अशी अनेक कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था तालुक्याने पाहिली. तर, गायकर पाटील पुन्हा राष्ट्रवादीत येताच वैभव भाऊ की गायकर साहेब. ! असेही द्वंद्व पहायला मिळाले. त्यामुळे, नगरपंचायतीत देखील अशीच परिस्थिती पहायला मिळू शकते. त्यामुळे, या दोन्हा पक्षांनी मतांचे विभाजन न करता एकत्र निवडणुका लढविल्या पाहिजे. असे मत अनेकांनी व्यक्त केले  आहे.
               आता मतांचे विभाजन कसे होईल आणि आपला विजय कसा खेचून आणता येईल ही रणनिती माजी मंत्री पिचड साहेब यांच्यापेक्षा अधिक कोण जाणु शकत नाही. त्या जोरवर त्यांनी ४० वर्षे तालुक्याचे राजकारण केले. मात्र, सन २०१९ साली तो फंडा पवार साहेबांनी धुळीस मिळविला. आता तेच जर नगरपंचायतीत झाले, तर याचा तोटा कॉंग्रेसला बसेलच. मात्र, राष्ट्रवादी शिवसेनेला देखील मोठा फटका बसेल, यात तिळमात्र शंका नाही.  कॉंग्रेंसने जर स्वबळाचा नारा दिला. तर, त्यांच्या १७ जागांपैकी काही जागा विजयी होतील. तर काही ठिकाणी त्यांना दारुन पराभव स्विकारावा लागेल. इतकेच काय.! त्यांच्यामुळे, मत विभाजन होऊन राष्ट्रवादी-शिवसेनेची देखील सिट पडतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल. म्हणजे, जसे २०१४ व १९ मध्ये वंचित आघाडीने ताठर भुमिका घेत विधानसभेत ४० जागांची अवाजवी मागणी केली आणि ते सुत्र न जुळल्याने वंचित आघाडीकडे दुर्लक्ष केले गेले. निकालाअंती कॉंग्रेसच्या ३९ जागा ह्या केवळ व़चित आघाडीमुळे गेल्या होत्या. त्यानंतर वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हणून टिकेला सामोरे जावे लागले होते. आता, नगरपंचायतीत कॉंग्रेसने ताठर भुमिका घेतली तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, त्यांनी वरिष्ठांशी बोलुन तालुक्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळणे गरजेचे आहे. तर, राष्ट्रवादीने देखील त्यांना सन्मानानं सामिल करुन घेणे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.     
एकंदर, महाविकास आघाडी झाली तर डॉ. किरण लहामटे, सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी एकोप्याने काम करणे गरजेचे आहे. तीन पक्ष एकत्र आल्यास पक्षात नारजी आणि बंडखोरी मोठ्या प्रमणावर होऊ शकते. कारण, अनेक इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी कही गम हेच वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळणार आहे. त्यामुळे, याची आडवा अन त्याची जिरवा अशी रणनिती अनेकांची असणार आहे. ही प्रवृत्ती मोडून काढण्याचे काम या चौघांना करावे लागणार आहे. तर, या सर्व प्रक्रियेत मधुभाऊ यांचा रोल महत्वाचा असणार असून. ते देखील महाविकास आघाडीत सामाविष्ठ होण्याच्या मनस्थितीत असतील. कारण, त्यांना नुकतेच जिल्हा बँकेवर घेण्यात आले आहे. त्यामुळे, त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. आता जर ते स्वबाळावर लढण्याचा निर्णय घेतला तर त्यात अपयश आल्यास त्यांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसू शकतो. जिल्ह्यात व राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यांनी पदापोटी हवेत गोळीबार केल्याची टिका होऊ शकते. त्यापेक्षा त्यांनी सर्वांना सोबत घेऊन लिड करावे आणि तालुक्यात त्यांना पुन्हा राजकीय किंग मेकरच्या भुमिकेत येण्याची संधी मिळाली आहे. त्याचे "घे घास पी पाणी" न करता भुमिका घेऊन स्वत:ला किंगच्या भुमिकेत ठेवले पाहिजे. अर्थात ते अशाच प्रकारचा निर्णय घेतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यांची भुमिका काय.! यासाठी घोडे आणि मैदान फार काही दुर नाही...!