संगमनेरात आनंद, अकोल्याने सोडला सुटकेचा नि:श्वास, धांदरफळ येथील 7 जण कोरोनामुक्त जिल्हयात 49 रुग्णांची कोरोनावर मात
सर्वाभौम (अहमदनगर) :-
अकोले आणि संगमनेरकरांसाठी फार मोठी आनंदाची बातमी आहे. कारण, या दोन्हींच्या मध्यावर असणार्या धांदरफळ या गावातील कोरोना झालेल्या सात जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. त्यांना आज दुपारी बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, धकधक वाढविणार्या अॅब्युलन्स आता आनंदाचा निरोप घेऊन येत आहे. हा संदेश समजताच संगमनेरात मोठे आनंदाचे वातावरण पहायला मिळाले आहे. तर अकोले तालुक्यातील नागरिकांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना चांगले यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील एकूण 07 जण कोरोनामुक्त झाले आहेत. .त्यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील या 7 कोरोना बाधित रुग्णांनाच सामावेश आहे. आज दुपारी बूथ हॉस्पिटलमधून त्यांना डस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 49 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 62 असून त्यापैकी आता 10 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.धांदरफळ येथील रुग्णांना कोरोना बाधित आढळल्यानंतर उपचारासाठी बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील 10 दिवसांत त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. त्यांना आता आजाराची कोणतीही लक्षणे दिूसून येत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य तपासणी करून आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना पुढील 10 दिवस संगमनेर येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनीही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. घराबाहेर पडताना चेहर्यास मास्क बांधावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. विशेषता शहरी भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशा प्रकारची कृती नागरिकांनी टाळावी. स्वताच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रशासन घेत असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनाही त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य यंत्रणा आणि बूथ हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, इतर स्टाफ यांनी रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या या प्रयत्नाबद्दलही द्विवेदी यांनी धन्यवाद दिले.आतापर्यंत एकूण 1 हजार 847 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 735 स्त्राव निगेटिव्ह आले आहेत तर 62 व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आल्या आहेत. आता 49 व्यक्ती बर्या होऊन घरी परतल्या आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या पैकी 9 अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.
दरम्यान संगमनेर शहरात आणखी एक व्यक्ती कोेरोना बाधित असल्याचे समोर येत आहे. ही व्यक्ती संगमनेर शहरातील इस्लामपूर परिसरातील असून त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या महिलेने एका खाजगी रूग्णालयात उपाचार घेतले होते. मात्र, काही संशयित तपासण्यात समोर आल्यानंतर त्यांना नाशिक जिल्हा रूग्णालयात हलविले असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, एक खुशीची बातमी मिळताच दुसरे संकट उभे रहात असल्याचे दिसत आहे.
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)