शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लेखी देऊनही गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने केला पत्नीचा खून
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पत्नीच्या मृत्युनंतर ती गोठ्यात गाईचे दुध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती दगडावर जाऊन आदळली व मृत्यु झाला. असे भासविण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली असून तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असता आरोपी भगवान भाऊ हुलवळे (रा. चैतन्यपूर, ता. अकोले) यांच्यावर कलम 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासासाठी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 1995 साली मयत सविताचा विवाह चैत्यन्यपूर येथील भगवान भाऊ हुलवळे याच्यासोबत झाला होता. काही दिवस दोघांचा संसार चांगला चालला. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद होत राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांचा वाद फारच विकोप्याला जात होता. याबाबत सविताने माहेरी कल्पना दिली होती. मात्र, आज किंवा उद्या या वादावर तोडगा निघेल या हेतूने नेहमी समझदारीची भुमिका घेतली.

दरम्यान गुढीपाडव्याच्य दिवशी (25 मार्च) सकाळी सविता गाईच्या गोठ्यात गेल्यानंतर तिला गाईने लाथ मारल्याने तिचा मृत्यु झाल्याची माहिती मयत मुलीचे वडील पुंजा आवारी (रा. धामनगाव आवारी) यांना सांगण्यात आली. त्यानंतर चौतन्यपुरला गेले तोवर तिला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर योग्या उपचार झाला की नाही? तिच्या मृत्युचे खरे कारण काय आहे? अशी काहीच कल्पना मिळाली नाही. मात्र, त्यांनी मुलीच्या अंत्यविधिनंतर सखोल माहिती घेतली. तेव्हा त्यांना समजले की, त्या दिवशी सकाळी 6 वाजता या दोघांचे गायीच्या गोठ्यात दूध काढताना वाद झाले होते. त्याचा राग मनात धरुन तिच्या पतीने पत्नीच्या डोक्यात काहीतरी टणक हत्यार मारले. यात तिचा मृत्यु झाला आहे. त्यांची ही माहिती येईपर्यंत पोलिसांनी सविताची आकस्मात मृत्यु झाल्याची नोंद केली होती. मात्र, आपल्या मुलीस न्याय मिळावा यासाठी आवारी यांनी वरिष्ठांकडे आपली कौफीयत मांडली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी संबंधित गुन्हा दाखल करण्याचेे आदेश दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी भगवान हुलवळे यांना अटक केली आहे. काल आरोपीस न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शंभर रुपयांच्या स्टँम्पवर लेखी घेऊनही मारले.!
माझ्या मुलीचा गेल्या 25 वर्षापासून छळ केला जात होता. त्याबाबत तिच्या पतीस समज देण्यात आली होती. इतकेच काय! त्याच्याकडून शंभर रुपयांच्या स्टँम्पवर लेखी घेण्यात आले होते. तरी देखील त्याने तिची हत्या केली. यात स्थानिक वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाने मला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत जाण्याची वेळ येते हे दुदैव आहे. या गुन्ह्यात तिच्या सासरच्यांना देखील सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी आवारी यांनी केली आहे.