हिवरगावमध्ये बिबट्याने चिमुकलीच्या नरडीचा घोट घेतला, जबड्यात मान पकडली दिड वर्षाची मुलगी ठार.!


सार्वभौम(संगमनेर) :- 

                      संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बिबट्याने दिड वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये दिडवर्षांच्या चिमुकलीच्या मानेवर बिबट्याचे दात लागल्याने ती जागीच ठार झाली. यात ओवी सचिन गडाख (रा.हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) ही मयत झाली आहे. ही सर्व घटना बुधवार दि. 10 जुलै 2024 रोजी सायं. 5:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे हिवरगाव पावसा गावावर शोककळा पसरली आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिवरगाव पावसा गावात रोडच्या कडेला गडाख वस्ती आहे. मयत ओवीचे आई वडील हे शेती व्यवसाय  करून दुध व्यवसाय करतात त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. दररोजप्रमाणे आज देखील काम सुरू होते. दुपारी गायांचे काम झाल्यानंतर त्यांना चारा काढण्यासाठी मयत ओवीची आई सायंकाळी मुलीला घेऊन घास कापण्यासाठी आली. मयत ओवीला शेताच्या बांधावर ठेवले. मात्र, तेथे बिबट्यांचा वावर जास्त असतो हे कदाचित आईला माहीत नसावे. मयत ओवी ही बांधावर खेळत होती. आई गायांसाठी घास कापत होती. रस्त्याच्या कडेला लोक येत जात होते. बिबट्याचा डोळा मात्र लहान चिमुरडीवर होता. त्याने या चिमुरडीला एकटीच असल्याचे पाहिले आणि आपला डाव साधला. बिबट्याने चिमुरडीवर हल्ला करत तिला तोंडात धरून उचलुन गिनींगवतात नेले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या शिक्षकांनी पाहिला.

             दरम्यान, पिडीत मुलीच्या आईने आरडा ओरडा सुरू केला. तेथे एकच गर्दी जमली. जनतेने गिनींगवताकडे धाव घेतली असता बिबट्याने चिमुरडीला सोडले. त्यानंतर तात्काळ दिड वर्षांच्या चिमुरडीला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत दिड वर्षांच्या चिमुकलीने आपला जीव गमावला होता. तिला रुग्णलयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले. खरंतर झोळे व हिवरगाव पावसा येथे बिबट्यांचा वाढता वावर पाहता येथील ग्रामपंचायतीने वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केली होती. परंतु आमच्याकडे पिंजरा शिल्लक नाही असे तोंडी सांगण्यात आले. आज हिवरगाव पावसा येथे वनाधिकारी यांनी वेळेत पिंजरा लावला असता तर सचिन शांताराम गडाख यांच्या मुलीचा जीव गेला नसता. त्यामुळे, वनाधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.    

सरपंचांनी दिलेले पत्राला वनअधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली नसती तर दिड वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला नसता. वनअधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यायला हवे होते पण तसे घडले नाही. मात्र, वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चिमुरडीचा बळी गेला त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ दोन दिवसात रस्ता रोको करून वनाधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करणार आहोत. जर गुन्हा दाखल झाला नाही तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठ पुरावा करणार आहोत.!

  - सोमनाथ भालेराव (मा. सेल, जि. अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट)