ग्रामपंचायत सदस्याने अशी टामी मारली की, तो अजून कोमात आहे.! परस्पर विरोधी नऊ जणांवर गुन्हे.! पोलिसांचा गोलमाल.!
सावभौम (समशेरपूर) :-
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे मागिल भांडणाचे कारण आणि रस्त्यात जनावरे बांधण्याच्या कारणाहून दोन गटात तुंबळ हाणामार्या झाल्याची घटना दि. 21 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात एका व्यक्तीच्या मस्तकावर टामी मारल्यामुळे त्याचे काही दात पडले असून मस्तकात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे तो आज पाच दिवस उलटून गेले तरी कोमात आहे. मात्र, दुर्दैव असे की, अकोले पोलिसांनी 307 ऐवजी यात किरकोळ मारहाण झाल्याचा गुन्हा नोेंदविला आहे.
एकीकडे हा जखमी व्यक्ती पाच दिवसांपासून जीवण-मरणाशी संघर्ष करीत असताना 307 (खुनाचा प्रयत्न करणे) असा गंभीर गुन्हा दाखल करण्याऐवजी 324 (किरकोळ मारहाण) अशा शुल्लक कलमांवर भागविले आहे.हेच प्रकरण नाही तर अशा अनेक प्रकरणात हा प्रकार सर्रस पहायला मिळतो आहे. ही पद्धत म्हणजे पहिल्यांदा 324 दाखल करणे आणि नंतर मोठी कलमे लावण्यासाठी हात पुढे करणे, असा मलिदा खाणार्या खाकीची अर्थपुर्ण तडजोड आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. कारण, असे अनेक गुन्हे आहेत त्यात अकोले पोलीस असा फंडा वापरत असल्याची अकोले तालुक्यात आणि पोलीस खात्यात देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समशेरपूर येथे जगताप व साळवे या दोन कुटुंबात हाणामार्या झाल्या आहेत. यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अमोल रघुनाथ साळवे (रा. समशेरपूर, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 21 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही घरात जेवण करीत होतो. त्यावेळी, दिपक दत्तात्रय जगताप, दिगंबर जगताप, दत्तु यशवंत जगताप, सविता दिगंबर जागताप, माया जगताप (सर्व रा. समशेरपूर, ता. अकोले) हे आमच्या घरात घुसले व म्हणाले की, तुम्ही मुद्दाम तुमची जनावरे रोडमध्ये का बांधता? असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करु लागले.
मी त्यांना समजून सांगत असताना त्या सर्वांनी मला, माझी आई अलका, पत्नी शुभांगी, भाऊ विजय, भाऊजय पुजा अशा सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर ग्रामपंचायत सदस्य दिपक जगताप याने त्याच्या हातातील टॉमीने वडील रघुनाथ साळवे यांच्या तोंडावर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या दातांवर व डोक्यास मार लागला आहे. तसेच अमोल साळवे, विजय साळवे यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. त्यानंतर धमकी देत ते घराबाहेर निघून गेले. अशा प्रकारचे अमोल यांनी दोन दिवसांनी म्हणजे दि.23 ऑक्टोबर रोजी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर या दरम्यान दिपक जगताप यांनी देखील अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याची माहिती हाती आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, साळवे हे नेहमी रस्त्यात त्यांची जनावरे बांधत असतात. त्यामुळे समाजाला त्याचा त्रास होतो. तर रात्रीच्या वेळी जनावरे रस्त्यात बांधल्यामुळे ते दिसत नाहीत परिणामी एखादा अपघात होऊ शकतो. त्यामुळे, ही जनावरे बाजुला बांधली पाहिजे. असे मत त्यांनी मांडले होते. मात्र, हे रघुनाथ साळवे, अलका साळवे, अमोल साळवे, विजय साळवे यांना मान्य झाले नाही. परिणामी वरिल व्यक्तींनी त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या दोन्ही गुन्ह्यांची माहिती अकोले पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार यांना विचारली असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे माहिती नाही. सीसीटीएनएसच्या कर्मचार्यास विचारा. त्यांनी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता त्यांनी पहिल्यांदा माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. एक ना दोन अनेक कारणे सांगून नंतर खरे कारण सांगितले की, मी जरा बाहेर आलो आहे. त्यामुळे, जायला वेळ लागेल. मात्र, माहिती तेथे मिळते की नाही यापेक्षा तपासी अधिकार्यांकडून घ्या. तपासी अधिकार्यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्याकडे माहिती नाही. मी बाहेर आहे. ठाणे अंमलदारांकडून माहिती घ्या. पुन्हा त्यांना फोन केला असता त्यांनी एका कर्मचार्याचा नंबर दिला. तो देखील कोणी उचलला नाही.
ही वणवण येथेच थांबली नाही. त्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मी आज दोन दिवस सुट्टीवर आहे. मात्र, माहिती घेऊन देतो. दुर्दैवाने त्यांचा देखील मेसेज आला की, माहिती देणे शक्य नाही. कोणाला तरी पोलीस ठाण्यात जाऊन घ्यावी लागले. त्यानंतर पुन्हा एका कर्मचार्यास फोन केला असता त्यांनी वरवर उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे, दोन्ही गुन्ह्यांपैकी पोलीस ठाण्यातून कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र, नगरहून एक फिर्याद मिळवून ती मांडण्यात आली.
दरम्यान, इतका मोठा गुन्हा असताना तीन दिवसानंतर आणि रुग्ण कोमात आहे. हे माहिती असताना देखील केवळ 324 सारखा शुल्लक गुन्हा दाखल करणे. हे कितपत योग्य आहे. तसेच, एरव्ही स्वत:हून माहिती पुरविणारे पोलीस आज या गुन्ह्यात इतका पाठपुरावा करुन देखील माहिती देत नाहीत! हे शंकास्पाद नाही का? नेमकी असे काय गौडबंगाल आहे. हे कोडे न उलगडण्यासारखे आहे. मात्र, मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये अगदी 307, 326 अशा गुन्ह्यांना 324 मध्ये बसवून नंतर मोठी कलमे लावण्यासाठी हात काळे करण्याची परंपरा आता अकोले पोलीस ठाण्यात रुजू झाल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे अवैध धंद्यांवर खुद्द आमदार डॉ. किरण लहामटे हे उपोषणाचा अर्ज देतात, दुसरीकडे एक अर्ज निकाली निघत नाही म्हणून शिवाजी धुमाळ पोलीस ठाण्याबाहेर उपोषण करतात तर खानापूर सारख्या सामुहीक बलात्कार प्रकरणात पहिल्यांदा खोटा आरोपी तर काही गुन्ह्यात उशिरा कलमांचा वापर. असे अनेक प्रकार या पोलीस ठाण्यात दिसून येत आहेत. ऐकीकडे पोलीस ठाण्यात ठाणे आंमलदाराच्या समोरून काही खाकीतील कर्मचारी वाहनांचे टायर चोरुन घेऊन जातात आणि ते परस्पर गुन्हेगारांना विकतात. तरी देखील त्यांना पाठीशी घातले जाते. त्यामुळे, या पोलीस ठाण्यात नेमकी काय चालले आहे. हे आमदार किंवा पोलीस अधिक्षक यांनी स्वत: लक्ष घातले पाहिजे असे स्थानिक नागरिकांना वाटते आहे.