गटारीत सापडलं राजूर, कोरोनाच्या शिरकावाने दोन दिवस गाव बंद!


सार्वभौम (अकोले) : 
                         अकोले शहराला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता राजूर येथे देखील कोरोना बाधित महिला मिळून आली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या पलिकडे अकोले तालुक्यातून जे 23 जणांचे स्वॅब नेले होते. ते निगेटीव्ह आल्याने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या पलिकडे आणखी 85 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आज सकाळी लहीत येथील एका महिलेचा रिपोर्ट पाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तो भाग प्रशासनाने कंटेनमेंट केला आहे. तर आता राजूर शिक्षक कॉलनी हा भाग देखील कंटेनमेंट करण्यात आला आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर आता दोन दिवस राजूर बंद करण्याची विचार राजूकरांनी केला आहे. त्यामुळे ऐन गटारीच्या दिवशी गाव बंद राहणार असून या बंदमुळे खरोखर कोरोना गटारीत जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

                              याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने चर्चेला मोठे उधान आले आहे. त्यामुळे भल्याभल्यांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतले आहे. तर काहींनी अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन घेतली आहे. मात्र, आजही सामान्य लोक याकडे गाभीर्याने पाहत नाही. त्यांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ज्या समाजसेवक तथा पदाधिकार्‍यास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी आजवर स्वत: चांगले सामाजिक काम केले. या दरम्यान ज्यांच्याशी त्यांचा संपर्क आला आहे. त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी असा संदेश सोशल मीडियातून दिला आहे. मात्र, याबाबत काही अफवा पसरत आहे. आता प्रशासनावर काही लोक ताशेरे ओढत असून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, त्यांनी आजवर जे काम केले ते कोणी डोळ्यासमोर आणण्यास तयार नाही. इतकेच काय! जर कोणाच्या सांगण्याहून प्रशासकीय अधिकार्‍यांना क्वारंटाईन किंवा होमक्वारंटाईन करण्याची मागणी केली तर अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर पहायला मिळेल. कारण, एक रुग्ण सापडल्यानंतर गावा-गावात आपला ताफा घेऊन जाणारे अधिकारी होमक्वारंटाईन झाले तर ते त्यांच्यासाठी भारीच राहिल. मात्र, त्याचा तोटा सामान्य नागरिकांना आणि कोरोना बाधित रुग्णांना सोसावा लागेल.
                              आता राजूर येथे जी महिला कोरोना बाधित मिळून आली आहे. त्यांना पुर्वीच एका आजाराने ग्रासलेले आहे. त्यामुळे या महिलेस नगर येथे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. यावेळी शुक्रवार दि.11 जुलै रोजी त्यांचे स्वॅब घेतले होतेे. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना नगर येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सोमवार दि.13 जुलै रोजी  त्यांचा स्वॅब घेतला होते. आज सायंकाळी याबाबत जिल्हा प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाला त्याची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी तत्काळ राजुरला धाव घेऊन संबंधित विभाग कंटेनमेंट केला आहे. आता राजूरमध्ये रुग्ण सापडल्यानंतर राजूर बंद करण्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, यापुर्वी ग्रामपंचायत, आजी-माजी आमदार व प्रशासन यांच्यात शब्दयुद्ध झाल्यामुळे ग्रामपंचायत यांनी राजूर बंदला प्रतिसाद दिला नाही. मात्र, व्यापारी आणि ग्रामस्त यांच्या स्वयंप्रेरणेने राजूर रविवार दि.19 जुलै ते 21 जुलै पर्यंत बंद करण्यात येणार असल्याची माहिती काही शशिकांत ओहरा व संतोष चांडोले यांनी दिली.
                   या पलिकडे एका आनंदाची बातमी अशी की, उंचखडक बु व अकोले शहरातील काही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यात उंचखडक येथील सात रिपोर्टकडे अनेकांचे लक्ष होते. ते सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथील एक हजार लोक स्वयंप्रेरणेने होमक्वारंटाईन झाले आहेत. गावकर्‍यांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यामुळे प्रशासनाने गावकर्‍यांची आभार मानले आहे. 
- आकाश देशमुख