"चर्चा" राष्ट्रवादीची "एक्झिट" पोल "भाजपचा" !, कोण होणार आमदार ?
![]() |
कोण होणार दमदार आमदार !! |
आजवर कधीही इतकी "अटातटीची" निवडणूक झाली नसेल. तितकी २०१९ मध्ये पहायला मिळाली. वैभव पिचड यांच्या "पक्षबदलाच्या" भुमिकेने तालुक्याचे सगळे वातावरण बदलून गेले. जे कालपर्यंत साहेबांना "शिव्याशाप" देत होते. ते त्यांच्याच "व्यासपिठावर" जाऊन त्यांना "शब्दसुमनांच्या" माळा घालताना आपण पाहिले. पण, या निवडणुकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. पिचड साहेबांवर "जनता नाराज" नाही. पण, त्यांच्या "परिघाभोवती" जे काही "मक्तेदारीचे" वातावरण आहे. त्यांचा फटका साहेबांना नेहमी बसतो आहे. नाहीतर एरव्ही त्यांच्यासोबत कोणी नसताना १९९५ ला त्यांना जनतेने तारलेच की..!! त्यामुळे, सद्या तरी यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. परंतु, या तालुक्यात जय पराजय कोणाचाही असो. त्याचे अगदी "पोष्टमार्टम" रोखठोक "सार्वभौम" नक्की करणार. ते ही प्रमाण देऊन. त्यामुळे फक्त काही तास. "वेट अॅण्ड वॉच". तत्पुर्वी तालुक्याचा हालहवाला घेतला पाहिजे. सद्यातरी काही "राष्ट्रवादी प्रेमींच्या तोंडी" डॉ. लहामटे यांचे नाव आहे. तर, "एक्झिट पोल" च्या अंदाजानुसार वैभव पिचड हे "आमदार" झाल्याचे पहायला मिळत आहे.
![]() |
आत आमदार झाल्यासारखं वाटतय..! |
![]() |
पुन्हा आपणच "आमदार"..! |
पक्षानुसार विचार केला. तर, निष्ठावंत राष्ट्रवादी, पिचड विरोधी लाट, अशोक भांगरे यांचे आदिवासी एकगठ्ठा मतदान, राष्ट्रसेवादल आणि वैचारिक पुरोगामी जनता, सीपीआयचे एक गठ्ठा मतदान, भाजप विरोधी मुस्लिम मतदान, गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांच्या विरोधातील मतदान, नाराज शिवसैनिक आणि पोष्टल मतदान यामुळे वैभव पिचड यांना ही निवडणूक सोपी नाही. हे त्रिवार सत्य आहे. तर दुसरीकडे भाऊप्रेमी, लाभार्थी, मधुकर पिचड साहेबांचे निष्ठावंत, संस्थात्मक मतदान, शिवसेना, आरएसएस, रिपाई, भाजप, रासप अशा"अर्थ"पुर्ण पावर असणाऱ्या पक्षांच्या बळावर त्यांची मदार होती. त्यामुळे त्यांना आजही विजयाची खात्री आहे.विभागानुसार विचार केला. तर, पठार भागावर भाजप बहुतांशी ठिकाणी ठार झाल्याचे दिसले. कुरकुटवाडी, नांदूर अशा काही ठिकाणी तर बुथच दिसून आले नाही. दुपारी १२ ते १ वाजल्यानंतर भाजपचे १७ बुथ राष्ट्रवादीत विलीन झाल्याचे पहायला मिळाले. यापुर्वी पठार भागावर थोरात साहेबांच्या आशिर्वादाने पिचड साहेबांची नैया तरली जात होती. मात्र, काँग्रेसचा पंचनामा होऊ नये. यासाठी थोरात साहेबांनी ठाम भुमिका घेत. राष्ट्रवादीला पाठबळ दिले. तर, पठारावर नाराज शिवसैनिकांनी भाजपला घरचा "आहेर" दिला. तेथे थोरातांचे "अभय" डॉ. लहामटे यांना तारुन गेल्याचे विश्लेषकांना वाटते. पण, घारगावात वैभव पिचड यांची चांगली सरशी झाल्याचे बोलले जात आहे. पठारावर पुढारी आणि मतदार यांच्यात "विपक्ष" वातावरण पहायला मिळाले. वाटाघाटीहुन मतभेद झाल्याचा फटका मतदानावर झाल्याने पठार भाग चर्चेचा विषय ठरला. येथे भाजपसाठी फारसे अनुकूल वातावरण दिसले नाही. पण, मायनस भागाची तृटी अकोले शहरातून भरुन निघेल. असे वातावरण पहायला मिळाले. शहरात सगळे नगरसेवक अगदी पुन्हा घरोघरी जाताना दिसून आले. शहरात ज्या मागासवर्गीय वसाहती आहेत. तेथे प्रस्तापितांनी चांगलाच जोर दिला. दिवाळीचे बोनस अगदी दोन्हींकडून मिळाल्याने लोकं टपाटप घराबाहेर पडले. त्यामुळे वैभव पिचड यांना शहरासह सगळ्या प्रवरा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात सरशी मिळेल. असे विश्लेषकांचे मत आहे.
![]() |
थांबा २४ तारिख सांगेल.! |

शरद पवार साहेब अकोल्यात आल्यानंतर त्यांच्या सत्काराची औपचारिकता झाली नाही. त्यांची सभा, अजित पवार, धनंजय मुंडे यांची सभा कमळासाठी मारक ठरली. तर, मीडिया, मुख्यमंत्री दौरा, अमित शहांची सभा, जनतेचा हस्तक्षेप आणि भाजपत महायुतीमुळे झालेला नियोजनाचा आभाव. यामुळे, निष्ठावंत पिचड साहेबाच्या कार्यकर्त्यांचे मोरल डाऊन होताना दिसले. इतक्या मचक्यात वैभव पिचड यांचा संयम कधीही ढळल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे विरोधक पाहुणे गुण्यागोविंदाने नांदले आणि थंडीच्या वातावरणातही गरम खिशामुळे आपण कट्टर विरोधात होतो. हे देखील ते विसरुन गेले.
एकांदर विचार करता ही निवडणुक जनतेने हाती घेतली होती. तर, राजकीय अस्मितेसाठी पिचड कुटुंबाने सर्व ताकद पणाला लावली होती. कोठे भाजप कमी पडले तर कोठे राष्ट्रवादी. त्यामुळे दोन्हींचे पारडे जड भरले आहे. एक मात्र नक्की सकाळच्या पार्गात कमी मतदान झाले. त्या तुलनेत दुपारी आणि विशेषत: सायंकाळी मतदान केंद्रांवर गर्दीच गर्दी पहायला मिळाली. ६ चा अतीम वेळ असतानाही ७:३० वाजेपर्यंत यार्डमध्ये असणाऱ्या मतदारांचे मतदान सुरु होते. त्यामुळे हे मतदान कोणते असावे. हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे जो कोणी उमेदवार निवडून येईल. तो फारशा फरकाने नसेल. १३ हजार पेक्षा जास्त लिड कोणाला भेटल असे एकंदरीत वाटत नाही. असे राजकीय विश्लेषक, जाणकार, समाजसेवक, दोन्ही पक्षाचे नेते, पत्रकार यांना वाटते आहे. सद्यातरी प्रत्येकजण हवेत आहे. त्यामुळे या हवेत गेलेल्या फुग्यांना २४ तारखेला पिन मारुन जमिनिवर आणण्याचे काम इव्हिएम मशिन करणार आहे. त्यामुळे अणखी काही तासांची प्रतिक्षा करूयात.
"सुचना"
कोणी विजयी होवो अथवा पराजित. त्यांच्या विजयाची आणि पराजयाची कारणे "रोखठोक सार्वभौम" अगदी ठणकाऊन आपल्या समोर मांडणार आहे.सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८५ दिवसात १६६ लेखांचे १० लाख १८ हजार वाचक)