ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देणारे नेतृत्व- डॉ. विश्वासराव आरोटे
सार्वभौम (विशेष) :-
भारताचे संविधान हे लोकशाहीवर आधारलेले आहे. त्या लोकशाहीला तारणारे चार स्तंभ असून त्यात सर्वांवर नियंत्रण ठेवणारा पत्रकारिता हा सर्वात महत्वाचा घटक आहे. ही लोकशाही टिकविण्यासाठी जोवर अभ्यासू, सजग, निर्पेक्ष आणि निर्भिड पत्रकार निर्माण होत नाहीत. तोवर संविधानाचे संरक्षण होत नाहीत. म्हणून, अशा व्यक्तीमत्वांची देशाला गरज आहे. असेच एक सजग व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. विश्वासराव आरोटे होय.! अगदी लेखणीच्या तळाशी जेवून निस्वार्थपणाची भावना अंगीकारून त्यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण केेले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीज रोवण्यात अनेकाचे योगदान असेल. मात्र, त्याचा अमृतवेल वाढविण्याचे काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल. तर, प्रामुख्याने नाव डॉ. विश्वासरावांचे येते. आरोटे यांनी शहरी मात्तबरांच्या रांगेत उपेक्षित असलेल्या ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम केले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस पद मिळाले त्या दिवशी खऱ्या अर्थाने ग्रामीण पत्रकारांना दिवळी अनुभवायला मिळाली. त्यांच्या रुपाने पत्रकारांना एक विश्वास मिळाला. की, आपण देखील सन्मानानं जगू शकतो, लोकांना न्याय देऊ शकतो आणि स्वत:वर अन्याय झाला तर आपल्या पाठीशी कोणीतरी उभे राहू शकतो. त्या विश्वासाचे नाव म्हणजे डॉ. विश्वासराव होय..!!
जेव्हा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या व्यक्तीलाच कळू शकते. येथील पत्रकारांच्या काय समस्या आहेत. म्हणून तर पेपर टाकण्यापासून तर संपादकीय पाहणाऱ्या व्यक्तीच पत्रकार आणि पत्रकारीतेला न्याय देऊ शकतात. म्हणून तर अगदी अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशित असणाऱ्या चितळवेढे गावात आणि प्रवरामाईच्या तिरावर त्यांचा जन्म झाला. परिस्थिती बेताचीच असल्यामुळे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण ह.भ.प सावित्रीबाई मंदिर विठे. मा. मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालय राजुर येथे पूर्ण केले. तर, महाविद्यालयीन शिक्षण अकोले येथील महाविद्यालयात पूर्ण केले. परिस्थिती सामान्य असल्यामुळे आयुष्यात संघर्षाला तोटा नव्हता. मात्र, जिद्द ही कळसुबाईच्या शिखराऐवढी होती. त्यामुळे, शिक्षण घेत असताना सकाळी चितळवेढे येथून दूध घेऊन यायचे आणि नंतर वर्तमानपत्र वाटण्याचे काम करायचे. नंतर हमाली करायची आणि जसे काम असेल तसे शेतीत राबून आपल्या कुटुंबाचा सारथी होण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा आवड वैगरे असे म्हणता येणार नाही. पण, पैसा हवा होता. त्यामुळे, गरजवंताला लाज नसते. म्हणून तर वर्तमानपत्र वाटण्याचे काम करायचे. त्यातून वेळ मिळेल तेव्हा आवडीने आणि सवडीने ते वाचले जायचे. अशी ही संघर्षाची पाऊलवाट त्यांच्या अंगवळणी पडून गेली होती. पुढे वर्तमानपत्र वाचता-वाचता पत्रकारीतेचा प्रवास सुरु झाला आणि आज त्याच प्रवासाने क्षितिज गाठले आहे.
खरंतर, विश्वासरावांनी तालुका सोडून पुणे, मुंबई गाठली असती. तर, आज आहे यापेक्षा ती वेगळी ओळख निर्माण झाली असती. मात्र, ज्या मातीतून आपण आलो. त्या मातीचे आपण देणे लागतो. म्हणून त्यांनी ग्रामीण भागात पाय रोवले. खेड्यापाड्यात वृत्तपत्र पोचवून ग्रामीण भागातील वितरण वाढवायचा असेल तर त्या भागातील मुलभूत समस्या समजून घेऊन वृत्तपत्रात त्याची मांडणी होणे आवश्यक आहे. याची जाणीव विश्वासरावांना झाली. म्हणून त्यांनी ग्रामीण भागातूनच आपल्या पत्रकारीतेचा नारळ वाहिला. ग्रामीण भागातील समस्या आपल्या प्रभावी लेखणीच्या माध्यमातून मांडल्या. त्यातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अशक्य असे काही नाही असे म्हणत ध्येयवेडी स्वप्ने उराशी बाळगली आणि संपुर्ण महाराष्ट्र राज्य त्यांनी पायाखाली घातले. कोण काय म्हणेल, काय अडचणी येतील, कोण सोबत राहील हे सर्व कस्पटासमान माणून ते कर्तव्य करत राहिले. आज जे हे यश दिसते आहे. ते काही फुकट नाही. ग्रामीण भागातील वास्तव मांडताना अनेक अडीअडचणी आल्या, परंतु मुळातच अकोले तालुक्याला पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला असल्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्यांची विचारसरणी जुळली. त्यातूनच मार्गदर्शनाची एक नवी दिशा मिळत गेली. कर्तुत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम अस्तित्वात आला.
शब्दांमध्ये फार मोठी ताकद असते. या शब्दांचे विकेंद्रिकरण झाले आणि वास्तव मांडतांना अनेक पत्रकारांची माळी गुंफली गेली. या यशापर्यंत जेव्हा विश्वासराव पोहचले. तेव्हा त्यांनी थोडे मागे वळून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले. की, या प्रवासात ग्रामीण पत्रकारांच्या फार मोठ्या समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आपण पुढे होऊन काही तरी केले पाहिजे. या उद्देशाने त्यांनी संघटन बांधणी सुरू केली. निर्पेक्ष भावनेने केलेली बातमीदारी आणि पत्रकारांचे संघठन त्यांना आज मोठ्या पदावर घेऊन गेले. काल वार्ताहर म्हणून सुरु केलेले काम आज त्यांना अनेक वृत्तपत्रांमध्ये काम देऊन गेले. तेव्हा तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिक गांवकरी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्वासार्हता जपली. त्यांचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखील त्यांची नाळ जोडली गेली. या पत्रकारांच्या समस्या त्यांना आपल्या समस्या वाटू लागल्या. या समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे सारखे वाटत होते. म्हणून त्यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांची मोट बांधली. सर्वांस पोटास लावणे आहे. या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वचननाम्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्या अर्थाने कार्य सुरु केले. हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्याशी संपर्क झाला आणि दोघांचेही ध्येय एकच..पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे. ध्येय्य एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरु केले.
पत्रकारांच्या न्यायीक हक्कासाठी पछाडलेल्या या व्यक्तीमत्वाने या संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. दुऱ्याला न्याय देणाऱ्या पत्रकाराला न्याय देण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात आणि तालुक्यात विविध मेळावे घेतले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये एका छताखाली आणले. तू कोण हा प्रश्न उभा ठाकण्यापुर्वी त्यांनी प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन एक नवी ओळख निर्माण करुन दिली. सर्वच जिल्ह्यातील हजारो पत्रकारांचा विमा काढला. तुम्ही लढ़ा.! काही झालं तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठीशी खंबिर ऊभे आहोत. इतकेच काय.! तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी देखील तितक्याच खंबिरपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी निर्माण करुन दिला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्ह्याध्यक्ष आणि नंतर राज्य प्रदेश सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करताना त्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले.
स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकारसंघाच्या माध्यमातून सुरु करण्यात आला. पंडीत श्री. श्री रविशंकरजी यांनाही पत्रकार संघाने गौरविले आले. हलाखीची परिस्थिती असणाऱ्या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर ३वगरजा भागविण्यासाठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही डॉ.विश्वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे.तर कोरोना काळात मुत्यु कुटुंबातील परीवाराला मदत, किराणा वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार व शालेय साहित्य वाटप वारकरी संप्रदाय दिंडी पालखी सप्ताह मदत रेनकोट छत्री वाटप अनेक वर्षांपासून सुरू आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल विद्यासागर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री ना भागवत कराड माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, समाजसेवक अण्णा हजारे, महाराष्ट्र राज्य सरपंच पदश्री पोपटराव पवार विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी सभापती हरिभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते आ. अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री दिलीप वळसे, पद्माकर वळवी, आ सुधीर तांबे, आ. जयंत पाटील आ.रामराजे निंबाळकर, आ. बबनराव पाचपुते, आ. बाळासाहेब थोरात, ना. शंभुराज देसाई, ना संदिपान भुमरे. आ. राम शिंदे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींकडे त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या. पत्रकारांना संरक्षण मिळावे, संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. जेव्हा-जेव्हा पत्रकारांवर हल्ल्या झाला. तेव्हा-तेव्हा त्याचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत आरोटे यांनी पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अॅक्रीडीशन कार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासन नेत्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी, पत्रकारांच्या मुला मुलींच्या विवाह सोहळ्यास गॅस कनेक्शन भेट, दिपावली सणानिमित्त साखर, मिठाई, साडी भेट. महाराष्ट्रातील गोरगरीब महीला एकल महीलांना नगरपंचायत कामगार साफसफाई कामगार आदिवासी महीलांना किराणा व साडी वाटप करण्यात आले. पत्रकारांच्चा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्वास आरोटे करत आहेत. पत्रकार संघाने याच मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागरराव यांनीही घेतली होती.
त्यांच्या कार्यकाळात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांनी केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे. कोणताही पत्रकार असो त्यांना विश्वासराव माऊली म्हणुन संबोधतात त्यामुळे ते अधिक जिव्हाळ्याचे सबंध प्रस्थापीत करतात. राज्य पत्रकार संघाचे 20 राज्य स्तरीय अधिवेशन घेऊन त्यानी संघटन वाढविले आहे. त्यांच्या आजवरील कार्यकर्तुत्वाचा सन्मान म्हणून त्यांना आमेरीकेतील एका संस्थेने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. हा संघर्ष एका खेड्यापासून ते महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागात आजही अविरतपणे सुरु आहे. अशा पत्रकारीतेतील उतुंग व्यक्तीमत्वास आई तुळजा भवानी उदंड आयुष्य देवोत.!
- नवनाथ जाधव (पत्रकार)